कोल्हापूर : येथील शेती-प्रगती मासिकाचा चौदावा वर्धापनदिन समारंभ नुकताच कोल्हापुरात पार पडला. कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे १० शेतकरी आणि तीन विस्तार कार्यकर्त्यांचा या वेळी शेतीप्रगती कृषीभूषण पुरस्काराने खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच, तेजस प्रकाशनाच्या काही पुस्तकांचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘महिलांचा शेतीतील सहभाग’ या शेती-प्रगती विशेषांकाचे, तसेच ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ (व्ही. एन. शिंदे), ‘शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती’ (सुधाकर जाधव), ‘जी. एम. पिकांची दुनिया’ (वसंतराव जुगळे) आणि ‘कायापालट क्षारपीडित जमिनींचा’ (रावसाहेब पुजारी) या पुस्तकांचे प्रकाशन खासदार शेट्टी व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. दादा पाटील, ‘गोकुळ’चे माजी चेअरमन अरुण नरके, कृषीरत्न आनंद कोठाडिया, आरसीएफ लिमिटेडचे कार्यपालक संचालक एन. एच. कुरणे, विभागीय कृषी सह-संचालक दशरथ तांबाळे, सुधाकर जाधव, व्ही. एन. शिंदे, वसंतराव जुगळे, रावसाहेब पुजारी होते.
सत्कारमूर्तींमध्ये जयपालण्णा फराटे (मौजे डिग्रज), प्रशांत लटपटे (सावळवाडी), चवगोंडा अण्णा सकाप्पा (दानोळी), शंकर धोंडिबा खाडे (बेडग), बळीराम जाधव (जेऊर), बाळासाहेब सोळांकुरे (हेळेवाडी), अमोल आनंदा लकेसर (दुधारी), सुरेखा अनिल पाटील (निमशिरगाव), संजय शिवाप्पा माळी (जांभळी), सतीश जयपाल चौगुले (भिलवडी), चंद्रकांत सूर्यवंशी (कोल्हापूर), मारुती आनंदा जाधव (वांगी) आणि प्रदीप संकपाळ (सांगली) यांचा समावेश होता.
‘उसाच्या ‘एफआरपी’चा मुद्दा केवळ शेतकऱ्यांचा नसून, तो साखर कारखानदारांचाही आहे. तो शेतकऱ्यांचा हक्क आहे. साखर कारखानदार सरकारला प्रश्न विचारत नाहीत. गेल्या वर्षीच्या साखरेच्या दरावर यंदाची एफआरपी कशी काय ठरवता येईल? याचा जाब मी सरकारला विचारतोच आहे. कारखानदारांनीही तो विचारायला हवा. सरकार यामध्ये लक्ष देणार नसेल, तर कारखानदारांनी कर्ज काढून एफआरपी शेतकऱ्याला दिला पाहिजे. यासाठी सरकारवर दबाव आणायला हवा,’ असे राजू शेट्टी म्हणाले.
या वेळी जयपालण्णा फराटे, शंकर खाडे, व्ही. एन. शिंदे, वसंतराव जुगळे, सुधाकर जाधव, दशरथ तांबाळे, एन. एच. कुरणे, आनंद कोठाडिया, अरुण नरके, पी. आर. दादा पाटील यांची भाषणे झाली. अहिल्यादेवी रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, बेळगाव जिल्ह्याती शेतकरी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(पुरस्कारविजेत्या शेतकऱ्यांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)